वंदे मातरम
भूमिका
भारतीय गणतंत्राचा अंमल सुरु झाला त्यास साठ वर्षे पूर्ण होत आहेत. पण स्वराज्य सुराज्य झालेले नाही, ही कटू वस्तुस्थिती! वाजवी कारणाने सज्जन देश सोडत आहेत. काही वर्षांपासून, पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीच्या आसपास, बुद्धिप्रामण्यवादी म्हणवणा-यात, एक मेल फिरत असते. राष्ट्रगीताच्या संदर्भात, रीझोल्युशन सारखी! ‘जन गण मन’ गीत, किंग जॉर्जच्या स्वागतासाठी तयार झाले. म्हणून ‘वंदे मातरम’ आपले राष्ट्रगीत असावे.’ त्यास अनुमोदन सुचवणा-या सह्या असतात. ते पाहून मी चक्रावते. सही करताना, अनुमोदन देता यावे इतकी माहिती आपल्यापाशी आहे का, हा प्रश्न त्यांना पडत नाही, याचे मला नवल वाटते.
माझे आई-वडील आणि श्वशुर यांनी स्वातंत्राच्या प्राप्तीसाठी लाठ्या झेलल्या. कारावास पत्करला. देश स्वतंत्र झाल्यावर देशभक्तीस व्यवसाय न ठरवता ते संसाराला लागले. विचार आणि वाचनाचा संस्कार माझ्या बाळगुटीत! जितेगा भारत कैसे, या प्रश्नाच्या उत्तरात, आपली पाळेमुळे जाणणे महत्वाचे ठरले पाहिजे, हे माझे प्रांजळ मत! झाडे असोत की व्यक्तिमत्त्वं! मुळे छाटण्याची परिणीती 'बोन्साय' असते, असे मी समजते. म्हणून गणतंत्राचा हिरक महोत्सव साजरा होत असताना, विश्वव्यापक मंचावर, ही माहिती द्यावी, असे वाटले.
स्मिता भागवत.
वंदे मातरम
संघराज्याची स्थापना होण्यापूर्वी राष्ट्रगीताचा प्रश्न उपस्थित झाला नसता. देशात छोटी-मोठी राज्ये होती. प्रत्येक राज्याचे ध्वज, मुद्रा आणि राष्ट्रगीत होते. ब्रिटीशांचा एकछत्री अंमल सुरु झाला. त्यांनी समस्त प्रजेवर, 'God save the Queen' हे राष्ट्रगीत लादले. पण ते यशस्वी झाले नाहीत. १८९६ च्या कलकत्ता कॉंग्रेसच्या खुल्या अधिवेशनाची सुरुवात, आव्हान दिल्यागत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 'वंदे मातरम'च्या उदघोषाने केली. हे गीत प्रकाशित झाल्याला आणि जनतेने ते नाकाराल्याला तोवर वीस वर्षे झाली होती. पण गुरुदेवांनी जणू शब्दात प्राण फुंकले. जनतेने अक्षरशः रोमांचाचा चमत्कार अनुभवला.
बंकिमचंद्र चटर्जी या गीतप्रसवाच्या संदर्भात लिहितात, "१८७५च्या सात नोव्हेंबर - दुर्गाष्टमीस रात्री मी नावेतून प्रवास करत होतो. अनायासे माझी नजर क्षितिजाकडे वळली. सूर्योदयाचा संकेत मिळत होता. मी उन्मनी अवस्था गाठली. मला जलात भारतमाता दिसली. गूढरम्य! दुर्गामातेगत भुजा फैलावलेली! पण तिच्या सर्व हातात, आभूषणांच्या जागी साखळदंड होते. मी अस्वस्थ झालो. तोच मला खळखळाट जाणवला. साखळदंड तोडून मातृभूमीने तेजस्वी शस्त्रे धारण केली. सिंहारूढ मातेच्या पायदळी शत्रू होता. मी शहारलो. महाशक्तीस वंदन करण्यास मी हात जोडले. नकळत मी उद्गारलो, "वंदे मातरम!" उन्मनी अवस्थेत माझ्या तोंडून पूर्ण गीत घरंगळले."
त्यावेळी बंकिमचंद्र जिल्हाधिकारी होते. त्यांचे बंधू संजीबचंद्र यांचे ‘वंगदर्शन’ नावाचे साप्ताहिक होते. लिखाणात या बंधुंचा सिंहाचा वाटा असे. बंकिमजींच्या दुर्गेशनन्दिनी वगैरे कादंब-या त्यात धारावाहिक रूपाने प्रकाशित झाल्या. अंक मुद्रित होताना कधी थोडी जागा उरे. ती भरण्यासाठी पानपूरके ठरण्याजोगे छोटे-मोठे लिखाण, मेजाच्या खणात (Drawer) असे. गरजेनुसार ते घ्यावे, अशी कामगारांना सूचना होती. तसे ते गीत वापरले गेले. पुढे आनंदमठ या कादंबरीतही ते होते. त्यावेळी गीतासाठी मेघमल्हार राग सुचवला होता.
गीताची निर्मिती झाली तेव्हा ते कुणाला आवडले नव्हते. खुद्द त्यांची मुलगी नाक मुरडत 'न संस्कृत न बंगाली, असे धेडगुजरी गीत ' असे म्हणाली. आग्या वेताळ संचारल्यागत समीक्षकही तुटून पडले. हे गीत कुणी गाण्याचे धाडस करणार नाही, असे त्यांच्या मुलीने छातीठोकपणे सांगितले. सर्वत्र चेष्टा होत असताना बंकीमजी स्वस्थ होते. लोक खनपटीस बसले, तेव्हा ते म्हणाले, "या गीताचे महात्म्य उमगावे, अशी आज कुणात क्षमता नाही. काळाच्या गर्भात काय दडले आहे ते सांगणे योग्य नसते. तरी मी खात्रीपूर्वक सांगतो, भविष्यात या गीताचा आशय समजण्याची कुवत निर्माण होईल. हे गीत अक्षरमंत्ररूप धारण करील. अवश्य मंत्ररूप ठरेल."
स्वातंत्र्यसमरात हे गीत मंत्रासारखे परिणामकारक ठरले. ‘वंदे मातरम’ शब्द ऐकताच प्रजेचा ऊर आदर आणि अभिमानाने भरून येई. या मंत्रात प्रेतात प्राण फुंकण्याचे सामर्थ्य आहे, असे म्हटले जाई. राज्यकर्त्यांनी धास्ती घेऊन ‘वंदे मातरम’ म्हणण्यावर बंदी लादली. पण कारागृहे भरली तरी ‘वंदे मातरम’ हा उदघोष शमला नाही. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु.... कित्येक देशभक्त ‘वंदे मातरम’ हा उदघोष करीत फाशीच्या तख्तावर चढले.
निर्मितीक्षम व्यक्तीचे द्रष्टेपण गृहीत धरतात. बंकीमबाबुंच्या भविष्यवाणीनुसार त्यांची निर्मिती मंत्ररूप बनली. पण १८९६ नंतर छेडलेल्या आंदोलनात! लोकांना या गीताचे महत्व पटवण्यासाठी गुरूदेवांचा परिसस्पर्श व्हावा लागला; यास इतिहास साक्षी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर तयार झालेले 'वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम हे ग.दि.मां.चे पु.ल. व सुनिताबाईंवर चित्रित केलेले गीतही अजरामर झाले, यासही इतिहास साक्षी आहे.
जे गाण्याचे साहस कुणी करणार नाही, असे त्यांची कन्या म्हणाली आणि समीक्षकांनी त्यास दुजोरा दिला, ते गीत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळात आदराने विविध बंदिशीच्या रुपात सादर झाले. सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेत वीररस निर्माण करण्यासाठी ते हवे वाटले. म्हणून श्री. तिमिर बरेन यांनी ते दुर्गा रागात स्वरबद्ध केले. पंडित ओमकारनाथ ठाकूर, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, एम.एस. सुबलक्ष्मी, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, इत्यादी शास्त्रीय गायक ते नौशाद, ए.आर. रहेमान पर्यंत ही यादी वाढते. आनंदमठ चित्रपटात सुरश्री लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायिलेले गीत इतक्या वर्षानंतरही रोमांचक वाटते. दूरदर्शन व आकाशवाणीवर सादर होणारी धून पंडित रविशंकर यांची आहे.
हे गीत आपले राष्ट्रगीत असेल, अशी बहुतेकांना खात्री वाटली. ते घडले नाही. दिग्गज व्यक्तीचा प्रभाव वा वशिलेबाजीसारख्या हा सवंग किस्सा नव्हता. साधक-बाधक विचारांती घेतलेला तो सुयोग्य निर्णय होता. टीकेचा सोपा मार्ग टाळून, तर्कशुद्ध मीमांसा जाणून घेतली तर पुर्वाग्रहाचे उच्चाटन व्हावे असा! त्या काळच्या पुढा-यांविषयी आदर निर्माण व्हावा असा!
या गीताने इतिहास घडवला. कॉंग्रेस अधिवेशनात ते प्रथम गाण्यात आले. संस्कृत-बंगाली गीत! त्याच्या निर्मितीच्या मुळाशी दुर्गेचे स्तवन होते. म्हणून कॉंग्रेसेतर पक्षांनी व मुस्लीम लीगने त्यास विरोध केला होता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा अनुरोध करणा-या राष्ट्राचे राष्ट्रगीत पक्षाचे, भाषेचे वा धर्माचे ठरू नये. तरी मातृभूमीच्या रुपात दुर्गा प्रगट झाली, याकडे बोट दाखवून व पाच कडव्यातील अर्थाकडे लक्ष वेधून, त्या वेळच्या नेत्यांनी हे दुर्गा - हिंदुधर्माचे प्रार्थनागीत नाही, हे सिद्ध केले. ते निखळ देशभक्तीपर गीत असल्यानेच, जाती-धर्माच्या गुंत्यात न गुंतता, सर्व देशभक्तांसाठी प्रेरक ठरल्याचे सिद्ध केल्यावरच ‘जन गण मन’ गीतास राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला. कारण....
राष्ट्रगीतास विशिष्ट आचारसंहिता असते. हे गीत समस्त नागरिकांच्या हृदयात होते. लोकांनी विविध ढंगात मनःपूर्वक गाइले होते. लोकप्रिय गीतास, आचारसंहितेत बांधणे सा-यांना अयोग्य वाटले. तेव्हढ्याच तोलाचे ‘जन गण मन’ उपलब्ध असताना तर विशेषच! वंदे मातरम गीतास राष्ट्रीयगीताचा सन्मान बहाल करूनच ‘जन मन गण’ राष्ट्रगीत झाले.
आता हे गीत किंग जॉर्ज यांच्या सन्मानार्थ लिहिले, व ‘भारतभाग्यविधाता’ शब्द पंचम जॉर्ज यांचा गौरव करण्यासाठी आहे, या हीन आरोपाचे खंडन! राजकारण आपला प्रांत नाही, असे म्हणणा-या गुरुदेव टागोरांनी, सामान्य नागरिक या नात्याने 'वंदे मातरम' हे गीत गाईले. ‘जन गण मन’ गीत त्यांची निर्मिती! या कवनात समग्र भारतभुमीचे दर्शन झाले, असे डॉ. राजेद्रप्रसाद म्हणाले. 'भारतभाग्यविधाता' म्हणजे पंचम जॉर्ज, असा त्या वेळच्या 'सो कॉल्ड' सुशिक्षितांनी बादरायण संबंध जोडला. त्याचे पडसाद, त्याच पठडीतील सुशिक्षित म्हणवणा-या उथळ लोकात अजून उमटत आहेत. जालियानवाला बागेच्या क्रूर घटनेनंतर राजकारणात सक्रीय नसूनही इंग्रजांनी दिलेला ‘सर’ किताब गुरुदेवांनी परत केला. त्या गुरुदेवांवर, पंचम जॉर्जचे लांगुलचालन करण्याचा आरोप, हा पोरकटपणाचा कडेलोट! तर्काचे नाते तोडणे! अकलेचे तारे तोडणे! त्यास अनुमोदन देणारे स्वतःस सुशिक्षित म्हणवणारे माहितीशून्य भारतीय! त्यांच्या देशप्रेमाची(?) तुलना, गुरुदेवांशी! गेल्या शतकातून या शतकात आलेला हा थिल्लर विनोद! उथळ पाण्याचा खळखळाट!
वास्तविक पंचम जॉर्ज यांच्या स्वागत समारोहात हे गीत गाणे हे गुरुदेवांचे दुःसाहस! पंचम जॉर्ज आले तेव्हा भारत नावाच्या देशाचे अस्तित्व नव्हते. नसलेल्या देशाचे ते भाग्यविधाते कसे? स्वतंत्र देशाचे स्वप्न पाहणा-या विवेकानंदांनी, नवसुचित देशासाठी भारत नाव सुचवले. हे ठाउक असणारे महाभागही तरी उथळ रीझोल्यूशनच्या खळखळाटात वाहून जातात. गुरुदेव ऑर्डरप्रमाणे कवन देणारे इंग्रजांचे भाट नव्हते, हे कळत नाही; त्यांना ‘भारतभाग्यविधाता’ शब्द लोकमताचा आदर सुचवतो, हे कसे कळणार?
वंदे मातरम या गीताचे महात्म्य सामान्य जनतेस समजावणे आणि जन गण मन हे कवन किंग जॉर्जसमोर म्हणण्याचा पराक्रम करून, गुरुदेव विश्वपटावरून निघून गेले. जिवंत असताना त्यांनी निंदा-स्तुतीची तमा बाळगली नाही. ही चिखलफेक त्यांच्यावर आता परिणाम करणार? हे समर्थन आहे, नव्या पिढीस ऐतिहासिक धुरंधरांचे महात्म्य कळावे यासाठी! सुशिक्षित म्हणवणा-या शिक्षित पोपटांच्या उर्ध्वीकरणासाठीही! भारतीय गणराज्याचा हिरकमहोत्सव थाटाने साजरा होत असताना तरी या पायाहीन पूर्वग्रहास नख लागावे; ‘‘जन गण मन" या अजरामर गीताची निर्मिती आणि ‘वंदे मातरम’ या गीताचे महात्म्य सामान्य जनतेस समजावणे, हे रास्त श्रेय आहे; त्या गुरूदेवांची नालस्ती थांबवून, शिक्षितांनी सुशिक्षित ठरावे, या सदिच्छेपोटी हा कळवळासूचक आटापिटा! देशाचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत दोन्हीस ज्यांचा परिसस्पर्श लाभला, त्या गुरुदेव टागोरांना मानवंदना देण्यासाठीही!
जय हिंद!
स्मिता भागवत.
smita_bhagwat@hotmail.com
(काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या माझ्या 'सारे जहांसे अच्छा...' पुस्तकात राष्ट्रध्वज, राष्ट्रमुद्रा, आणि राष्ट्रगीत या विषयी अधिक माहिती उपलब्ध. संपर्क (1 289 752 8885)



Reply With Quote

Bookmarks